“एका मताची किंमत किती? या जिल्ह्याने दाखवला लोकशाहीचा जिवंत पुरावा”

“एका मताची किंमत किती? या जिल्ह्याने दाखवला लोकशाहीचा जिवंत पुरावा”
धाराशिव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत शिवसेना उद्धव ठाकरे चे उमेदवार अमर समुद्रे यांनी भाजपचे उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताच्या फरकाने पराभव करत ऐतिहासिक व निसटता विजय संपादन केला.
ढोकी गणातील मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत होती. प्रत्येक फेरीत आघाडी बदलत असल्याने मतमोजणी केंद्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेरच्या फेरीत निकाल निर्णायक टप्प्यात पोहोचला आणि उपस्थित सर्वांच्या उत्सुकतेचा कळस गाठला.
अधिकृत आकडेवारीनुसार शिवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे यांना ३१८७ मते, तर भाजपचे उमेदवार निहाल काझी यांना ३१८६ मते मिळाली. परिणामी, अवघ्या एका मताच्या फरकाने विजय काँग्रेसच्या पदरात पडला. या निकालामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेने लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताचे असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. “माझ्या एका मताने काय होणार?” हा प्रश्न विचारणाऱ्या मतदारांसाठी ढोकी गणातील निकाल हा जिवंत उदाहरण ठरला आहे. एका मतानेही निकालाचे चित्र पालटू शकते, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाकडून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडल्याचे सांगण्यात आले असून अंतिम निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. ढोकी गणातील हा निकाल सध्या जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.



