राजकारण

मुंबई महापालिकेत नवे राजकीय पर्व; वंचित–काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब

मुंबई महापालिकेत नवे राजकीय पर्व; वंचित–काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेसह मुंबईच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनंतर जागावाटपावर प्राथमिक एकमत झाले असून, एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये सीट शेअरिंगचा करार झाला असून, त्यासंदर्भातील कागदपत्रांवर दोन्ही बाजूंनी सह्या करण्यात आल्या आहेत. या युतीमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ताकदीत वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, या युतीत काँग्रेस नेमक्या किती जागांवर निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांशी पुढील चर्चासत्र सुरू असून, त्यानंतर अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, वंचित बहुजन आघाडी–काँग्रेस युती हा मुंबईच्या राजकारणातील ‘मास्टर स्ट्रोक’ ठरू शकतो. विशेषतः दलित, वंचित, अल्पसंख्याक आणि मध्यमवर्गीय मतदारांवर या युतीचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घोषणेमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांसमोर या युतीचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. आता काँग्रेसच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!