कर्तव्यदक्ष नेतृत्व हरपले; मंत्रालयातील शोकसभेत अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली

कर्तव्यदक्ष नेतृत्व हरपले; मंत्रालयातील शोकसभेत अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य प्रशासन शोकसागरात बुडाले असून, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

शोकसभेत उपस्थितांना संबोधित करताना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले की, “अजित पवार यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्तव्यभावनेने शासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे.” त्यांच्या शब्दांतून उपस्थितांची भावना व्यक्त झाली.

या श्रद्धांजली सभेला मंत्रालयातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये डॉ. इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस. चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्व उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.

शोकसभेच्या माध्यमातून मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांच्या कार्यकुशलतेला, शिस्तप्रियतेला आणि प्रशासकीय योगदानाला कृतज्ञतेने उजाळा दिला.



