सेवा, संवेदनशीलता आणि सक्षम नेतृत्वाचा ठसा; सिईओ कुलदीप जंगम यांना सोलापुरातून भावनिक निरोप
नुतन सिईओ कुशल जैन यांचे स्वागत; जंगम यांच्या कार्याचा सर्व स्तरांतून गौरव
सेवा, संवेदनशीलता आणि सक्षम नेतृत्वाचा ठसा; सिईओ कुलदीप जंगम यांना सोलापुरातून भावनिक निरोप
नुतन सिईओ कुशल जैन यांचे स्वागत; जंगम यांच्या कार्याचा सर्व स्तरांतून गौरव
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या बदलीनिमित्त आयोजित निरोप समारंभात त्यांच्या कार्यशैलीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्व स्तरांतून गौरव करण्यात आला. आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांसाठी केलेली सेवा आणि पुरस्थितीत केलेले मदतकार्य ही आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे जंगम यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्याने यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर नुतन सिईओ कुशल जैन यांच्या स्वागताचाही कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते जंगम व त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी जंगम यांचा सत्कार करण्यात आला, तर कुशल जैन यांचे विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीने स्वागत करण्यात आले.

*“कामांची खरी ताकद म्हणजे टीमवर्क” – जंगम*
मनोगतात जंगम म्हणाले की, सोलापूर जिल्हा परिषदेत काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, मात्र सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच मोठी कामगिरी साध्य झाली.
आषाढी यात्रेतील नियोजन, पुरग्रस्त गावांमध्ये केलेले काम आणि विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे समाधान कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
“कानावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः निर्णय घेणे महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनातील संतुलित दृष्टिकोन मांडला.

त्यांनी अनुकंपा भरती व सेवाकर्मी पुरस्कार हे एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे स्पष्ट केले. आपल्या यशामागे पत्नीचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. तेजस्विनी जंगम यांनी सोलापूरमधील अनुभव आनंददायी असल्याचे सांगत, “येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ अविस्मरणीय आहे. जिल्हा परिषदेचे नाव राज्यभर पोहोचले,” असे मत व्यक्त केले.
*“ही बदली खंतजनक” – इंद्रजित पवार*
उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जंगम यांच्या बदलीबद्दल नाराजी व्यक्त करत, “त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक आणि प्रशासकीय पातळीवर नुकसान झाले,” असे सांगितले.
*“जंगम यांची दिशा कायम ठेवू” – कुशल जैन*
नुतन सिईओ कुशल जैन यांनी सोलापूर जिल्ह्याच्या व्यापक भौगोलिक रचनेचा उल्लेख करत, “जंगम यांनी सुरू केलेल्या पथदर्शी कामांची दिशा कायम ठेवत पुढे वाटचाल करू,” अशी भूमिका स्पष्ट केली.
*“शांत, संयमी आणि परिणामकारक नेतृत्व” – दिपक वैद्य*
अध्यक्ष दिपक वैद्य यांनी जंगम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांना “देवमाणूस” अशी उपमा दिली. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे प्रशासनात सकारात्मक बदल घडले, असे त्यांनी नमूद केले.
या समारंभात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, श्रीकांत भुजबळ, अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डॉ. एस. पी. माने, अविनाश गोडसे, गणेश हुच्चे, संजय गौडगाव, रणजित थिटे, संतोष निळ, जवंजाळ आदींनी मनोगते व्यक्त केली.

विविध कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना व युनियनच्या वतीनेही जंगम आणि कुशल जैन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभात कुलदीप जंगम यांच्या कार्याची प्रशंसा करत सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श भविष्यातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



