“शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांसाठी इंद्रजीत पवार आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन”

“शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांसाठी इंद्रजीत पवार आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन”
सोलापूर (प्रतिनिधी) :- उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजविषयक विविध समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजीत पवार यांनी पुढाकार घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. शेतकऱ्यांना दर्जेदार, अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता (सोलापूर ग्रामीण) मनीषकुमार सूर्यवंशी यांची भेट घेत विविध प्रलंबित प्रश्न मांडले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाडी-वस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अपुऱ्या क्षमतेचे डीपी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि नवीन वीज जोडण्यांमधील अडथळे यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर इंद्रजीत पवार यांनी शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडली.
बैठकीत त्यांनी वाडी-वस्त्यांवरील बंद असलेला सिंगल फेज वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. याशिवाय प्रत्येक गावाच्या गरजेनुसार नवीन डीपी उपलब्ध करून देणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच ज्या ठिकाणी गरज आहे त्या भागात १०० केव्हीए क्षमतेचे नवीन डीपी मंजूर करून बसविण्याची मागणीही त्यांनी केली.

इंद्रजीत पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती देत वीजपुरवठा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद केले. शेती, पाणीपुरवठा आणि दैनंदिन जीवनमान सुरळीत ठेवण्यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याने महावितरणने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावर कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांनी संबंधित सर्व मागण्यांची दखल घेत प्राधान्यक्रमाने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेनुसार प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल सुतार, गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, अरुण बारसकर, श्याम शिंदे, अमोल बोराडे, अझर शेख, माजी सरपंच दत्ता पवार, प्रवीण लबडे, पिंटू कापसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरूच राहील, अशी ग्वाही देत इंद्रजीत पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



