जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समिती सभेत विकासकामांचा आढावा; गुणवत्तेला प्राधान्य
जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित
जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समिती सभेत विकासकामांचा आढावा; गुणवत्तेला प्राधान्य
जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित
सोलापूर :- जिल्हा परिषद सोलापूरच्या शिवरत्न सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे उपस्थित होत्या.

तसेच जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे आणि रमेश भांजे यांनी सभेत सहभाग घेतला.
प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सदस्य सचिव स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती मीनाक्षी वाकडे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सदस्य सचिव स्मिता पाटील यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, स्थायी समिती सदस्य आणि उपस्थित विभाग प्रमुख अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यानंतर विविध विभाग प्रमुखांनी शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके आणि शासन निर्णयांचे वाचन केले. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आरोग्य विभागाच्या कामकाजावर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये उपलब्ध सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. औषधसाठ्याची उपलब्धता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा वेळेत उपलब्ध होणे यासंदर्भातील मुद्दे गांभीर्याने मांडण्यात आले.
आरोग्य सुविधा अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच जिल्हा परिषदेमार्फत विविध विभागांत सुरू असलेल्या विकासकामांची स्थिती, कामांचा वेग, गुणवत्ता आणि पारदर्शकता यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून ग्रामीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना बैठकीनंतर व्यक्त करण्यात आली.



