न्यायासाठी शिक्षकाचा एल्गार! कारवाई न झाल्यास २३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

न्यायासाठी शिक्षकाचा एल्गार! कारवाई न झाल्यास २३ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा
सोलापूर (प्रतिनिधी):- अक्कलकोट तालुक्यातील शिक्षक श्री. महातेश्वर हणमंतराव कट्टीमनी यांनी न्याय मिळावा या मागणीसाठी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत २३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा परिषद गेटसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन दिले आहे.

कट्टीमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या प्रतिनियुक्ती संदर्भात केलेल्या अनियमिततेबाबत सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी होऊनही तक्रार केल्याच्या कारणावरून त्यांचे विनाकारण निलंबन करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. सुमारे एक वर्षानंतर त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे नियुक्तीचे आदेश पाठवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
तक्रारीनंतर झालेल्या चौकशीची फाईल गेल्या सहा महिन्यांपासून वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असून दोषी अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप कट्टीमनी यांनी केला आहे. “दिड वर्षापासून न्यायासाठी धावपळ करत असूनही प्रशासन टाळाटाळ करत आहे. याशिवाय माझा उदरनिर्वाह निधीही बंद करण्यात आला असून आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दोषी गटशिक्षणाधिकाऱ्यावर निलंबन व विभागीय चौकशी करून कारवाई होईपर्यंत मी शाळेत हजर होणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच १० दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास २३ फेब्रुवारी २०२६ पासून जिल्हा परिषद गेटसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



