“अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ”- सुनेत्रा अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी

“अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ”- सुनेत्रा अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनेत्रा अजित पवार यांनी विधिवत घेतली. या शपथविधीनंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि शब्दांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शपथ घेतल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.”
सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यामधून सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि लोककल्याणाची स्पष्ट दिशा दिसून आली. उपमुख्यमंत्रीपद ही केवळ राजकीय जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली सेवा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्याच्या विकासामध्ये शेतकरी, महिला, युवक आणि दुर्बल घटक यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजित पवार यांच्या कार्यशैलीचा आणि निर्णयक्षम नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
राजकीय वर्तुळात सुनेत्रा अजित पवार यांच्या शपथविधीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या प्रशासनात नवा दृष्टिकोन आणि संवेदनशील कारभार पाहायला मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



