15 जूनपासून राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू
इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेसाठी प्रवेशाचे आवाहन
15 जूनपासून राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू
इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेसाठी प्रवेशाचे आवाहन
सोलापूर (प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेला 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रारंभ होणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन परीक्षेचे मुख्य प्रवर्तक तथा विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी संलग्न असलेले प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तसेच भारत सरकारच्या आयएसओ (I.S.O.) मानांकन प्राप्त या परीक्षेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यावर्षी दोन ते तीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
ज्ञान, बुद्धिमत्ता, तार्किक विचारशक्ती आणि स्पर्धात्मक तयारी यांचा विकास करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा आयोजित केली जात आहे. परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे जाळे कार्यरत असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी सांगितले की, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन होणार असून त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात येईल.
राज्यातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी साधावी आणि पालकांनीही मुलांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ज्ञानाधारित स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.



