महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांचा बिगुल; १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल – आचारसंहिता लागू

महापालिका निवडणुकांचा बिगुल; १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल – आचारसंहिता लागू

मुंबई (प्रबुध्द राज न्यूज) :- दीर्घकाळ रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, राज्यातील शहरी राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आजपासून सर्व महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Oplus_16908288

*निवडणूक कार्यक्रम*

नामनिर्देशन अर्ज दाखल: २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर

अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर

उमेदवारी माघार: २ जानेवारी २०२६

चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: ३ जानेवारी २०२६

मतदान: १५ जानेवारी २०२६

मतमोजणी व निकाल: १६ जानेवारी २०२६

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांनंतर तातडीने महापालिका निवडणुकांची घोषणा होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर ही घोषणा झाल्याने शहरांच्या सत्ताकारणाला निर्णायक वळण मिळणार आहे. अनेक महापालिकांमध्ये प्रशासक राजवट असल्याने या निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. दिलेल्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

या निवडणुकीसाठी राज्यभरात ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असल्याची माहिती देण्यात आली आहे. १ जुलै २०२५ रोजीची अधिसूचित मतदारयादी वापरण्यात येणार असून, ही यादी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यामध्ये बदल किंवा नाव वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मतदारयादीतील संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह देण्यात येणार आहे. अशा मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांनी कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याची माहिती घेतली आहे. ज्यांनी प्रतिसाद दिला आहे, त्यांनाच संबंधित केंद्रावर मतदानाची परवानगी दिली जाणार असून, प्रतिसाद न दिलेल्यांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे.

निवडणूक प्रचारासंदर्भात मोठा निर्णय घेत स्टार प्रचारकांची संख्या २० वरून ४० करण्यात आली आहे. तसेच मतदारांना मोबाईल अॅपद्वारे आपले नाव, प्रभाग व मतदान केंद्राची माहिती मिळणार असून, हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध आहे आणि लवकरच आयओएसवरही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली.

महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, आगामी काही आठवड्यांत राज्यभरात निवडणूक प्रचाराची धग वाढणार हे निश्चित आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!