सरपंचांच्या थेट संवादातून उलगडणार विकासाचे गुपित; जिल्हा परिषदेत मोठी सुरुवात
सरपंचांच्या थेट संवादातून उलगडणार विकासाचे गुपित; जिल्हा परिषदेत मोठी सुरुवात
सोलापूर(प्रतिनिधी):- ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत, ‘महा मिशन ग्राम सरपंच संवाद’ या उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेत करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मिशनचे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे गावपातळीवरील विकासकामांना नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, VSTF राज्य संपर्क अधिकारी दिलीपसिंह बायस, अनौनी मेहता, राज्य सल्लागार मधुकर पकाले, दिल्ली येथील प्रमुख विशाल, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी सरपंच संवाद अॅपच्या माध्यमातून थेट सरपंचांशी संवाद साधला. जिल्ह्यातील ४३ गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, स्वच्छतेसाठी सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘स्वच्छ गल्ली स्पर्धा’ ही केवळ स्पर्धा नसून, गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ग्रामस्थांचीच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच जिल्ह्यातील २७ गावांतील पाणीपुरवठा योजना सोलार आधारित करण्यात येत असून, वीजेअभावी पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले. यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत VSTF मधील ग्रामपंचायतींनी राबविलेले उपक्रम ‘सरपंच संवाद अॅप’वर नियमित अपलोड करण्याचे आवाहन केले. गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी सरपंचांनी नेतृत्व घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात धामनेरचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी लोकसहभागातून राबविलेल्या विविध विकास उपक्रमांची माहिती दिली. विकासासाठी केवळ निधी नव्हे, तर ग्रामस्थांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी सरपंचांना प्रेरणादायी आवाहन केले.

या ‘सरपंच संवाद’ उपक्रमामुळे गावपातळीवरील समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचणार असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामविकासाला वेग मिळणार आहे. त्यामुळे महा मिशन ग्राम अंतर्गत सुरू झालेला हा संवाद ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



