कागदपत्र तपासणी जीवघेणी ठरली; आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जालना (प्रतिनिधी) :-
समृद्धी महामार्गाने जालना एमआयडीसी येथे आलेल्या ट्रकचालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. मृत चालकाच्या मुलाने आरटीओ अधिकाऱ्यांवर दमदाटी आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
अकोल्याहून माल घेण्यासाठी आलेले मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन (वय 48) हे त्यांच्या ट्रकसह शनिवारी रात्री ७ वाजता जालना एमआयडीसीत दाखल झाले. ट्रकसोबत त्यांचा २० वर्षीय मुलगाही होता.
एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर आरटीओ चेकपोस्ट असल्याने अधिकाऱ्यांनी ट्रक थांबवला आणि वाहन व मालासंबंधी चौकशी सुरू केली.कागदपत्रे तपासणी चालू असताना चालकाला अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
तेव्हा इतर ट्रक चालक, त्यांचा मुलगा आणि आरटीओ कर्मचारी यांनी त्यांना सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात नेले.पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृत चालकाचा मुलगा आक्रोशाने म्हणाला:
“आरटीओ निरीक्षक भागवत पारिस्कर आणि त्यांचे गाडी चालक पाटील यांच्या धमकी, ओरड आणि दबावामुळे माझे वडील घाबरले आणि त्यांचा मृत्यू झाला!”
याच ठिकाणी अनेक चालक व वाहतूक संघटनांनी जमून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.घटनेची माहिती पसरताच अनेक ट्रक चालक, मालक संघटना आणि कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात जमा झाले.
सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मृत चालकाच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
चालक संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे: “संबंधित अधिकारी निलंबित करून गुन्हा दाखल करा — अन्यथा जालना बंद!”
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, परंतु मुलाचे आरोप पाहता तपासाचे वर्तुळ आरटीओ अधिकाऱ्यांभोवती फिरू लागले आहे.


