करकंबमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार विठ्ठलभक्तीत तल्लीन
'आदिनाथ देशमुख यांच्या निमंत्रणामुळे या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले' - जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

करकंबमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; उपाध्यक्ष इंद्रजीत पवार विठ्ठलभक्तीत तल्लीन
‘आदिनाथ देशमुख यांच्या निमंत्रणामुळे या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले’ – जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
करकंब, दि. २२ ( ता.पंढरपूर ) आषाढी वारीच्या पावन परंपरेत संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे करकंब येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच “जय जय राम कृष्ण हरी” या अखंड नामघोषाने संपूर्ण करकंब परिसर दुमदुमून गेला. हजारो वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होत विठ्ठलभक्तीचा अनोखा उत्सव अनुभवला.

या पवित्र सोहळ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी उपस्थित राहून संतपरंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. पालखीचे दर्शन घेत त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला तसेच संतांच्या विचारांचा समाजजीवनावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला.

यावेळी बोलताना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार म्हणाले, “जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख यांच्या निमंत्रणामुळे या पवित्र पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी हे केवळ धार्मिक प्रतीक नसून समाजात समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी महान परंपरा आहे. अशा सोहळ्यांमुळे समाजात एकात्मता आणि संस्कार अधिक दृढ होतात.”

या स्वागत सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरोटे तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि वारकरी यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत भावपूर्ण स्वागत केले.

करकंब नगरीत दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग-भजनांच्या सुरावटीत आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. संतपरंपरेचा वारसा जपत समाजात ऐक्य, सद्भावना आणि अध्यात्माची प्रेरणा देणारा हा पालखी सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.




