देशात द्वेषाचे वातावरण वाढतेय; दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – प्रकाश आंबेडकरांचा इशारा
देशात द्वेषाचे वातावरण वाढतेय; दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – प्रकाश आंबेडकरांचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी):- प्रकाश आंबेडकर यांनी ‘अग्निवीर’ योजना, देशातील सामाजिक वातावरण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकार व मीडियावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अग्निवीर जवानांना ‘आर्मी ॲक्ट’ लागू व्हावा, शहीद झाल्यास पूर्ण सन्मान व मोबदला मिळावा, यासाठी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत दाखल याचिकेवर बोलताना आंबेडकर म्हणाले की, आज सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने दुसऱ्या पक्षाला नोटीस बजावली असून पुन्हा मेंशन करण्यास सांगितले आहे. लष्करी भरतीचे अधिकार केंद्र सरकारला Indian Army कायद्यांतर्गत मिळतात. एकदा जवान युद्धभूमीवर गेला की त्याच्यावर ‘आर्मी ॲक्ट’ लागू होतो, त्यामुळे अग्निवीर जवानांनाही समान न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
देशात वाढत चाललेल्या द्वेषाच्या राजकारणाबाबत बोलताना त्यांनी गंभीर इशारा दिला. समाजात परस्परांविरोधात द्वेष पसरवला जात असून परिस्थिती धोकादायक दिशेने जात असल्याचे त्यांनी म्हटले. “देशात गोधरासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती वाटते,” असे ते म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकांबाबत त्यांनी मीडियावर टीका केली. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व कमी झाले असतानाही चुकीचे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. समाजात भीती व ध्रुवीकरण वाढवण्याचे राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा लढा ब्रिटिशांविरोधात होता. इतिहास नीट वाचल्यास चुकीची विधाने होणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.



