घर, छप्पर, मजला… सगळी माहिती का नोंदवली जाणार? जनगणनेचा पहिला टप्पा सुरू
घर, छप्पर, मजला… सगळी माहिती का नोंदवली जाणार? जनगणनेचा पहिला टप्पा सुरू
नवी दिल्ली :- देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ पासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात घरयादी आणि गृहगणना केली जाणार असून, यासाठी ३३ प्रश्नांची अधिकृत यादी अधिसूचित करण्यात आली आहे.


केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
या मोहिमेसाठी नियुक्त केलेले प्रगणक (Enumerator) नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन घराची मालकी, घराचा वापर (निवासी/व्यावसायिक) तसेच घराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य — जसे की छप्पर, भिंती, मजला याबाबत सविस्तर माहिती नोंदवणार आहेत.
जनगणनेच्या पुढील टप्प्यातील संवादासाठी आणि माहितीच्या पडताळणीसाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांक देखील या टप्प्यात नोंदवला जाणार आहे. मात्र, ही माहिती केवळ शासकीय वापरासाठी असून ती गोपनीय ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या जनगणनेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला असून, प्रगणक प्रत्यक्ष येण्याच्या १५ दिवस आधी नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नागरिक स्वतः ऑनलाइन पद्धतीने आपली माहिती नोंदवू शकणार आहेत.
*दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये*
पहिल्या टप्प्यातील गृहगणना प्रक्रिया सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणनेचा दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा — प्रत्यक्ष लोकसंख्या गणना — राबवला जाणार आहे. या टप्प्यात नागरिकांची वैयक्तिक व सामाजिक माहिती संकलित केली जाणार आहे.
देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी, शासकीय योजना, आरक्षण धोरण आणि विकासकामांसाठी जनगणना महत्त्वाची ठरणार असल्याने जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



