शिक्षक होण्याचा मार्ग बदलू शकतो; महाटीईटी उमेदवारांनी हे वाचाच

शिक्षक होण्याचा मार्ग बदलू शकतो; महाटीईटी उमेदवारांनी हे वाचाच
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालाच्या अनुषंगाने उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करण्याची तसेच निकालात काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास ते नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येणार आहेत. यासाठी उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक व आवश्यक तपशील वापरून संकेतस्थळावर लॉगिन करणे बंधनकारक आहे.
आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे की, ऑनलाईन पद्धतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने प्राप्त होणाऱ्या अर्जांचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे सर्व उमेदवार व परीक्षार्थींनी दिलेल्या मुदतीतच अधिकृत संकेतस्थळावरून आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाटीईटी परीक्षा ही राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, या निकालावर पुढील भरती व पात्रतेचे निकष ठरणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपला निकाल काळजीपूर्वक तपासून आवश्यक असल्यास वेळेत आक्षेप नोंदवावा, असेही परीक्षा परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.



