‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसीस मुदतवाढ – अदिती तटकरे

मुंबई (प्रतिनिधी):- राज्य शासनाचा मोठा निर्णय
‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी, नैसर्गिक आपत्ती आणि कौटुंबिक संकटांमुळे आपली कागदपत्रे वेळेत पूर्ण करता येत नसल्याचे लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनेक महिलांना आलेल्या अडचणींची दखल
अलिकडील नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्यातील अनेक कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी मिळणे शक्य नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अडकून राहिली होती. या महिलांना न्याय मिळावा म्हणूनच मुदतवाढ देणे अत्यावश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले.
घटस्फोटित व पती/वडील दिवंगत असलेल्या महिलांसाठी विशेष तरतूद
ज्या पात्र महिलांचे,पती किंवा वडील हयात नाहीत,महिला घटस्फोटित आहेत,त्यांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करावी लागणार आहे.
कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये — महिला व बाल विकास विभाग
महिला व बाल विकास मंत्री म्हणाल्या की,
“कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये हे शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच ई-केवायसी प्रक्रियेस २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.”
सरकारच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करून योजना लाभ मिळवण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. विस्तारित कालावधीत सर्व लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



