भाजप प्रवेशानंतर अवघ्या चार दिवसात ‘यु-टर्न’? अजित पवार गटात सोलापूरमध्ये मोठा राजकीय पेच
भाजप प्रवेशानंतर अवघ्या चार दिवसात ‘यु-टर्न’? अजित पवार गटात सोलापूरमध्ये मोठा राजकीय पेच
सोलापूर (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खळबळ उडाली असून सोलापूरच्या राजकारणात महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन माजी नगरसेवकांच्या पुन्हा घरवापसीसाठी हालचाली सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित न झाल्याने हे दोन्ही माजी नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परतण्यास इच्छुक असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश हा केवळ तात्पुरता निर्णय होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते व राज्याचे मंत्री दत्तात्रय ऊर्फ दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत दोन्ही माजी नगरसेवकांच्या घरवापसीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र या घरवापसीला पक्षांतर्गत जोरदार विरोध होत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी या दोन्ही माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात प्रवेश दिल्यास आम्ही आमच्या पदांचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे ही घरवापसी सध्या तरी रडखडलेली असल्याचे स्पष्ट होत आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे आता शिवसेना शिंदे गटाचीही या प्रकरणात एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. कारण या दोन्ही माजी नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यास त्याचा थेट परिणाम शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील स्थानिक राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या हालचालींमुळे सोलापूरचे राजकारण अधिकच तापले असून, या पेचप्रसंगातून मंत्री दत्तात्रय भरणे नेमका कोणता तोडगा काढतात, याकडे संपूर्ण शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



