सोलापुरात भाजप कार्यकर्त्याचा टोकाचा इशारा; तिकीट न मिळाल्यास 30 तारखेला आत्मदहनाचा दावा
सोलापुरात भाजप कार्यकर्त्याचा टोकाचा इशारा; तिकीट न मिळाल्यास 30 तारखेला आत्मदहनाचा दावा
सोलापूर : सोलापुरातील भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत अस्वस्थता तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार आणि एकनिष्ठ कार्यकर्ता अंबादास जाधव यांनी तिकीट न मिळाल्यास भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना आज घडली असून, आता पुढे पक्ष कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंबादास जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भावनिक होत आपली व्यथा मांडली. “मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात का जाऊ? दरवेळी युती आली की आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले. तीन वेळा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यात आम्ही मेहनत घेतली आहे,” असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, “यावेळी मला तिकीट मिळाले नाही तर मी माझ्या बायकोला काय सांगू, मुलांना काय सांगू, मित्रांना काय सांगू? लोक मला विचारतील—तू एवढा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही तुला तिकीट का मिळाले नाही?” असे म्हणत जाधव डोळ्यांत अश्रू आणून हुंदके देत रडताना दिसले. पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होत होती.

जाधव यांनी अधिक गंभीर भूमिका घेत “मला तिकीट नाही मिळाल्यास मी भाजप कार्यालयासमोर एक लिटर पेट्रोल ओतून आत्मदहन करीन,” असा थेट इशाराही दिला आहे. तसेच 30 तारखेला आत्मदहन करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे.
या घटनेमागे सोलापुरातील भाजपमध्ये झालेल्या इनकमिंग आणि तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेला असंतोष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जुने व निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जात असल्याची भावना वाढत असून, त्यामुळे पक्षांतर्गत वाद उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे.
आता या संपूर्ण प्रकरणात भाजप पक्ष काय निर्णय घेणार, कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर केली जाणार आणि परिस्थितीवर तोडगा काढला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



