“डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भावनांचा चबुतरा फाटला; ठेकेदारी अभियंते आणि शासनाच्या दुर्लक्षाचा कडवा पुरावा!”
सोलापूरचा अपमान की समाजघात? बाबासाहेबांच्या वास्तूची ही अवस्था का?

सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):- मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीसाठी सात रस्ता येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व सांस्कृतिक भवनाची अवस्था आज अतिशय दयनीय झालेली आहे. इमारतीच्या चबुतऱ्याला पडलेली भीषण भगदाडे, तुटलेल्या काचा, धुळीत पडलेल्या खुर्च्या, आणि बंद अवस्थेत असलेला हॉल ही परिस्थिती बघता प्रशासनाने या वास्तूकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ही इमारत तत्कालीन कर्तबगार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २०१२ मध्ये उद्घाटन करण्यात आली. परंतु फक्त १३ वर्षांच्या कालावधीतच सदर बांधकामाचे सत्य समोर आले असून, बांधकामातील निकृष्ट दर्जा आणि मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही वास्तू सुभाष देशमुख अँड कंपनी या कंत्राटदाराकडून उभारण्यात आली होती. त्या काळातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या मिलिवगतीने कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याची शहरात चर्चा आहे.

मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी बांधलेली ही वास्तू आज वाळूत गेलेला पैसा आणि भ्रष्ट राजकारणाचे स्मारक झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉलमधील साहित्य खुर्च्या धुळखात पडलेले आहेत. इमारत रंगरंगोटीही न झाल्यामुळे संपूर्ण स्ट्रक्चर भकास अवस्थेत गेले आहे.
या फाटलेल्या पत्र्यामुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे तर उन्हाळ्यात उन्हाचा कर्मचारी व नागरिकांना त्रास होत आहे
पूर्वी या सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक कार्यक्रम,शैक्षणिक उपक्रम,शिबिरे,स्पर्धा, जयंती सोहळे,परिसंवाद नियमितपणे होत असत मात्र छताचे गळती आणि संरचनात्मक तडे वाढत असल्याने हॉलचा वापर थांबवण्यात आल्याची माहिती मिळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची इमारत असूनही शासनाचा हा दुर्लक्षाचा दृष्टीकोन अत्यंत धक्कादायक आहे. बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या नावाने उभारलेल्या वास्तूबाबत संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित असताना उलट दुर्लक्ष, हालचाल टाळणे आणि दोषींवर कारवाई न करणे हे गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

शहरातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची, संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली असून, पुढील काही दिवसांत या प्रश्नावर उपोषण आंदोलन आणि जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
“प्रत्येक वर्षी या इमारतीसाठी देखभाल निधी मंजूर केला जातो, परंतु तो कुठे जातो?” असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
आता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि संबंधित विभागाने तत्काळ लक्ष घालून या इमारतीचे नूतनीकरण तपासणी आणि जबाबदारांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची वास्तू जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहे का? की भ्रष्टाचारांना संरक्षण दिले जात आहे?



