विद्यार्थ्यांच्या आनंदी स्वागताने बहरले कल्याणशेट्टी शिक्षण संकुल; शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाचा जल्लोष
औक्षण, गुलाबपुष्प आणि सेल्फी पॉईंटची मेजवानी; विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

विद्यार्थ्यांच्या आनंदी स्वागताने बहरले कल्याणशेट्टी शिक्षण संकुल; शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहाचा जल्लोष
औक्षण, गुलाबपुष्प आणि सेल्फी पॉईंटची मेजवानी; विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत
अक्कलकोट : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि नव्या स्वप्नांची झलक पाहायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कै. पंचप्पा कल्याणशेट्टी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक मराठी, कन्नड आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
संस्थेच्या संचालिका सौ. शांभवी कल्याणशेट्टी, शिक्षण विभाग प्रमुख सौ. रूपाली शहा आणि विज्ञान विभाग प्रमुख सौ. पूनम कोकळगी यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चिक्की आणि चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्वागताच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उत्साहाने वर्गात प्रवेश करत नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले.
यावेळी शासनाकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके सर्व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख दिगंबर जगताप यांच्यासह मराठी, कन्नड आणि सेमी इंग्रजी विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
*विशेष आकर्षण*
शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त संपूर्ण विद्यालय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. प्रवेशद्वारावर काढण्यात आलेली सुंदर रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट आणि विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला विशेष सेल्फी पॉईंट हे आकर्षणाचे केंद्र ठरले. अनेक विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत आणि शिक्षकांसोबत सेल्फी काढत पहिल्या दिवसाच्या आठवणी जतन केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.



