सोलापुरात नवे नेतृत्व; कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
कुमार आशीर्वाद यांच्या कार्याचा गौरव; पुढील वाटचालीस शुभेच्छा

सोलापुरात नवे नेतृत्व; कार्तिकेयन एस. यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली
कुमार आशीर्वाद यांच्या कार्याचा गौरव; पुढील वाटचालीस शुभेच्छा
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनात आज महत्त्वपूर्ण बदल झाला असून नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात साध्या व औपचारिक वातावरणात हा पदभार हस्तांतरण सोहळा पार पडला.

यावेळी मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्तिकेयन एस. यांना अधिकृत कागदपत्रे सुपूर्द करत पदभार दिला. नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारताना कार्तिकेयन एस. यांनी प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
पदभार स्वीकारल्यानंतर नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून प्रलंबित व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेणार असे सांगितले. यावेळी त्यांनी हलक्या-फुलक्या शैलीत “तीन तासांत त्यांच्या डोक्यातील सर्व कामाचे ज्ञान माझ्या डोक्यात ट्रान्सफर करणार” अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला आणि वातावरण हलकेफुलके झाले.

दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या तक्रारींना तत्परतेने प्रतिसाद देऊन प्रशासन अधिक उत्तरदायी बनवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा व प्रशासनातील सुधारणा उपक्रमांचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निहऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, पंढरपूरचे तहसिलदार सचिन लंगुटे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



