“मोठ्या बदल्यांमध्ये एक नाव ठळक; तुकाराम मुंडे यांच्याकडे ‘या’ महत्त्वाच्या विभागाची धुरा!”
तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली

“मोठ्या बदल्यांमध्ये एक नाव ठळक; तुकाराम मुंडे यांच्याकडे ‘या’ महत्त्वाच्या विभागाची धुरा!”
तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली
मुंबई (प्रतिनिधी):- राज्य शासनाने जाहीर केलेल्या व्यापक बदली आदेशांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे तुकाराम मुंढे. सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंढे यांची बदली करून त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन (R&R), महसूल व वन विभागाच्या सचिवपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यात वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी अत्यंत संवेदनशील मानली जात असून, तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्षम व कडक प्रशासकीय शैलीमुळे सरकारने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे, अशी चर्चा प्रशासनात रंगली आहे.
दरम्यान, या बदल्यांमध्ये इतरही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अश्विनी भिडे यांची बदली मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
तसेच, विकास चंद्र रस्तोगी यांना वित्त विभागात (आर्थिक सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नेमण्यात आले असून, विनिता वैद सिंगल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे. परिमल सिंह यांची कृषी विभागात सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, माणिक गुरसाळ यांना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिवपद देण्यात आले असून, प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
या सर्व बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



