उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज निधन; राज्यभर तीन दिवसांचा शोक, सर्व कार्यालये बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज निधन; राज्यभर तीन दिवसांचा शोक, सर्व कार्यालये बंद
मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी घटना घडली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले आहे, अशी अधिकृत माहिती सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून शासकीय वायरलेस संदेशाद्वारे देण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. हा दुःखवटा 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 (दोन्ही दिवस समाविष्ट) राहणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार, या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार असून, कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हा आदेश मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, राज्यपालांचे सचिव, विधानसभा व विधानपरिषदेचे सचिव, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक, आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने अंमलबजावणीसाठी कळवण्यात आला आहे.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यभरातून विविध स्तरांतून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव एच. पी. बाविस्कर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



