नव्या स्वप्नांना अनंत चैतन्यची उबदार सुरुवात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
नवीन दप्तर, नवीन पुस्तके आणि नवीन उमेद; हन्नूरच्या अनंत चैतन्य प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात

नव्या स्वप्नांना अनंत चैतन्यची उबदार सुरुवात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
नवीन दप्तर, नवीन पुस्तके आणि नवीन उमेद; हन्नूरच्या अनंत चैतन्य प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात
अक्कलकोट : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त हन्नूर येथील महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची लगबग आणि शिक्षकांचा आनंद पाहायला मिळाला.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस विशेष ठरला. नवीन गणवेश, आकर्षक दप्तर, नव्या पाठ्यपुस्तकांचा सुगंध आणि मित्र-मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती.

प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच शरणप्पा हेगडे, माजी मुख्याध्यापक शिवप्पा साखरे, माजी शिक्षक सरदार मत्तेखाने तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात सांस्कृतिक विभागाच्या स्वप्नाली जमदाडे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करत नवागत विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला बिस्किटे आणि गुलाबपुष्प देऊन प्रेमळ स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी आणि शरणप्पा हेगडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात ज्ञानरूपी भेट देऊन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे, पर्यवेक्षक सुरेश जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे, धनंजय जोजन, शशिकांत अंकलगे, ज्येष्ठ शिक्षिका मृदुलादेवी स्वामी, सागर मठदेवरू, काशिनाथ पाटील, रविंद्र कालिबत्ते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजी माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन मल्लम्मा चपळगाव यांनी केले.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने बहरून गेला होता.



