“महापौरपदावर कुणाचा झेंडा? २९ महापालिकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर… राजकीय समीकरणे बदलणार!”

“महापौरपदावर कुणाचा झेंडा? २९ महापालिकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर… राजकीय समीकरणे बदलणार!”
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक ठिकाणी समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापौर पदासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गांसह महिला आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे. काही महापालिकांमध्ये महिलांसाठी राखीव आरक्षण आल्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळणार असून, तर काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर येथे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, लातूर, जालना याठिकाणी महिला आरक्षण लागू झाल्याने महिला उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.
ठाणे व लातूर येथे अनुसूचित जातींसाठी, तर कल्याण-डोंबिवली येथे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी कोल्हापूर, उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी यांसह अनेक महापालिकांचा समावेश आहे.
या आरक्षण सोडतीमुळे प्रत्येक पक्षाला नव्याने रणनीती आखावी लागणार असून, कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर होणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आगामी काळात उमेदवारांच्या नावांची घोषणा, आघाड्या-युती आणि अंतर्गत नाराजी यामुळे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



