सोलापूरच्या विकासाला ‘गडकरी गती’; एक लाख कोटींच्या रस्ते जाळ्याची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा; पुढील तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात महामार्ग, रिंग रोड, उड्डाणपूल आणि दळणवळण सुविधांचा मोठा विस्तार

सोलापूरच्या विकासाला ‘गडकरी गती’; एक लाख कोटींच्या रस्ते जाळ्याची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा; पुढील तीन वर्षांत सोलापूर जिल्ह्यात महामार्ग, रिंग रोड, उड्डाणपूल आणि दळणवळण सुविधांचा मोठा विस्तार
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील तीन वर्षांत तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांचे मजबूत जाळे उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अक्कलकोट येथे आयोजित कार्यक्रमात २७८४ कोटी रुपयांच्या सहा महामार्ग प्रकल्पांचे डिजिटल भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
• नितीन गडकरी यांच्या हस्ते ३ हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन •
यावेळी बोलताना श्री. गडकरी यांनी सोलापूर जिल्हा भविष्यात देशाचे “लॉजिस्टिक हब” बनेल, असा विश्वास व्यक्त करत सुरत–चेन्नई महामार्ग, सोलापूर रिंग रोड, पालखी महामार्ग आणि विविध राष्ट्रीय महामार्गांमुळे जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास कर्नाटक राज्य नियोजन व धोरण आयोगाचे उपाध्यक्ष बी.आर. पाटील, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव एस.जी. शेलार, विभागीय अधिकारी प्रशांत फेगडे, तांत्रिक सल्लागार संजय जयस्वाल आदी उपस्थित होते.
• “सोलापूरचा चेहरामोहरा बदलणार” •
नितीन गडकरी यांनी सांगितले की, २०१४ पूर्वी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५६५ किलोमीटर होती. आता ती वाढून १७५० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे.
याआधी ५२ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले होते. त्यापैकी सोलापूर शहरातील उड्डाणपूल वगळता सर्व कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आता पुढील तीन वर्षांत एक लाख कोटींच्या निधीतून
महामार्ग विस्तार
रिंग रोड
उड्डाणपूल
दुपदरीकरण
पुलांची उभारणी
दळणवळण सुविधा
यांची मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर शहरातील वाढती वाहतूक आणि कोंडी लक्षात घेऊन ३३ किलोमीटरच्या सोलापूर रिंग रोडसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा श्री. गडकरी यांनी केली.
यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार
इंधन बचत होणार,पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार
अशी माहिती त्यांनी दिली.
• प्रमुख रस्ते विकास कामांची घोषणा •
जुना पुना नाका ते बोरामणी नाका
प्रकल्प खर्च : १०२० कोटी रुपये
अहमदनगर – सोलापूर – कर्नाटक बॉर्डर महामार्ग
प्रकल्प खर्च : १० हजार कोटी रुपये
राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील कामे
निधी : ४८ कोटी रुपये
मुळेगाव रस्ता विकास
निधी : ३५ कोटी रुपये
•“सुरत–चेन्नई महामार्ग बदलणार सोलापूरचे भविष्य”•
गडकरी यांनी सांगितले की, सुरत–चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे सोलापूर जिल्हा देशाच्या मध्यभागी येणार आहे.
यामुळे उद्योगांना चालना ,वाहतूक वेळेत बचत लॉजिस्टिक सुविधा वाढ ,रोजगार निर्मिती,कृषी व पर्यटन विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
• बुद्ध सर्किट आणि पालखी महामार्गाचा उल्लेख •
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी २२ हजार कोटींचा बुद्ध सर्किट प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले. बोधिवृक्षाखाली मिळालेला अनुभव त्यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केला.
तसेच १२ हजार कोटींच्या पालखी महामार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून मार्गावर ४६ तलाव बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. गडकरी यांनी ग्रामीण विकासावरही भाष्य केले.
त्यांच्या मते ,सोलर पंप,ड्रिप सिंचन जलसंवर्धन,स्मार्ट व्हिलेज संकल्पना यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.
“सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करायचे असेल तर स्मार्ट व्हिलेजची संख्या वाढली पाहिजे,” असेही ते म्हणाले.
• “७५ वर्षांची उपेक्षा गडकरींनी दूर केली”; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे गौरवोद्गार •
गेल्या ७५ वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या अक्कलकोट तालुक्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सहा राष्ट्रीय महामार्गांची जोड देत ऐतिहासिक न्याय दिला आहे,” अशा शब्दांत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले.
अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या दीर्घकाळ झालेल्या उपेक्षेचा उल्लेख करत, गडकरी यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला नवी गती मिळाल्याचे सांगितले.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, अक्कलकोट हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला तालुका असल्याने अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला. या भागात पूर्वी एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. त्यामुळे उद्योग, व्यापार, वाहतूक आणि पर्यटन विकासाला मर्यादा येत होत्या.
मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे अक्कलकोट तालुका सहा महामार्गांनी जोडला जात असून हा या भागाच्या इतिहासातील सर्वात मोठा विकास असल्याचे त्यांनी नमूद केले.
दर्जेदार महामार्ग आणि दुपदरी रस्त्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
विशेषत,ऊस वाहतूक,कृषी माल बाजारात नेणे,दूध व भाजीपाला वाहतूक
ग्रामीण भागातील दळणवळण
यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
“रस्ते चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळणे अधिक सुलभ होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. राज्यासह देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. खराब रस्त्यांमुळे भाविकांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता.
महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर
प्रवास अधिक सुरक्षित होणार
वेळेची बचत होणार
वाहतूक सुलभ होणार
पर्यटन आणि धार्मिक विकासाला चालना मिळणार
असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट–गाणगापूर रस्त्याच्या पुनर्बाधणीची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
ही मागणी मांडताच गडकरी यांनी तत्काळ मंजुरी जाहीर केली. त्यांच्या घोषणेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला.
कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात रस्ते विकासाची क्रांती झाली आहे. त्याचा मोठा फायदा आता अक्कलकोट तालुक्यालाही होत आहे.
“पूर्वी दुर्लक्षित असलेला हा भाग आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. महामार्गांमुळे उद्योग, व्यापार, शेती, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट परिसरातील नागरिकांनीही महामार्ग प्रकल्पांचे स्वागत केले असून, यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
विशेषत,ग्रामीण भागातील संपर्क सुधारणा,मालवाहतूक सुलभता,पर्यटनवाढ, रोजगार संधी
यामुळे अक्कलकोटच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, आज भूमिपूजन होत असलेल्या महामार्ग प्रकल्पांमुळे अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच त्यांनी अक्कलकोट – गाणगापूर रस्ता
मोहोळ – वळसंग मार्ग
सोलापूर रिंग रोड
यांना मंजुरी देण्याची मागणी केली.
सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांनीही सोलापूरच्या विकासासाठी महामार्ग प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे सांगून केंद्र सरकारकडून आणखी विकासकामांना निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

• भूमिपूजन झालेले सहा प्रमुख प्रकल्प •
1) हसापूर ते बद्दाड रस्ता
निधी : १५५२ कोटी रुपये
2) वागदरी – अक्कलकोट – तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ बी
लांबी : ४७.६६ किमी
काम : पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण
खर्च : ३५३ कोटी रुपये
3) मोहोळ – बसवनगर – वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६५
लांबी : ८२ किमी
काम : पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण
खर्च : ७५६ कोटी रुपये
4) दुधनी रेल्वे उड्डाणपूल व रस्ता उन्नतीकरण
रस्ता लांबी : ४.१२२ किमी
खर्च : ९७ कोटी रुपये
5) बोरी उमरगे येथे बोरी नदीवरील मोठा पूल
लांबी : ०.७५ किमी
खर्च : २६ कोटी रुपये
*प्रकल्पांचे एकूण चित्र*
एकूण प्रकल्प
६
एकूण रस्ते लांबी
१७१ किमी
एकूण खर्च
२७८४ कोटी रुपये
*प्रकल्पांचे नागरिकांना होणारे फायदे*
या प्रकल्पांमुळे,
३९० किमी अंतराची बचत, प्रवासात ६ तासांची बचत,वाहतूक कोंडी कमी, इंधन बचत
सुरक्षित प्रवास, वन्यजीव संरक्षण उपाययोजना
अक्कलकोट व गाणगापूर तीर्थक्षेत्रांना सोपी जोडणी
कृषी, पर्यटन व उद्योग विकास
रोजगार निर्मिती
असे विविध फायदे होणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने सहा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सचिव एस.जी. शेलार यांनी केले. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध महामार्ग प्रकल्पांची माहिती दिली.
तर महामार्ग प्राधिकरणाचे आर्थिक सल्लागार संजय जयस्वाल यांनी आभार प्रदर्शन केले.



