डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन पुस्तिका व भित्तीपत्रकाचे लोकार्पण

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे लाखो भाविक भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना पुस्तिकेचे व भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, तसेच समितीचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा गौरव केला.“समता, बंधुता आणि न्याय हा संविधानाचा जीव आहे. या मूल्यांची अंमलबजावणी झाली तर खरी भारतनिर्मिती होईल,”
असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या समरसतेच्या संकल्पनेला मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध तालुक्यांना भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यांनुसार आतापर्यंत गुजरातमधील ११ गावांना भेट देण्यात आली असून तेथे,ग्रामस्वच्छता मोहीम,वृक्षारोपण,ग्रामसभा सहभाग,दलित व आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन,स्थानिक शाळेत मुक्काम,शिवारात भेट देऊन नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटविणे
या क्रियाकलापांचा समावेश होत असून हा उपक्रम आता महाराष्ट्रात देखील सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्यपालांनी केली.
प्रकाशित सूचना पुस्तिकेत भाविकांसाठी मार्गदर्शन, सुरक्षाविषयक सूचना, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सहाय्य आणि सेवाभावी संस्थांची माहिती समाविष्ट आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे लाखो लोक चैत्यभूमीवर येणार असल्याने प्रशासन, समिती आणि स्वयंसेवकांकडून तयारी पूर्ण झाल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता करताना उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
“बाबासाहेबांचे विचार काळाचा अंधार नाही तर मानवतेचा दीप आहे.”



