मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला नव्याने गती; शिर्षक गीताचे लोकार्पण नागपूरात, ग्रामविकासासाठी लोकसहभागावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला नव्याने गती; शिर्षक गीताचे लोकार्पण नागपूरात, ग्रामविकासासाठी लोकसहभागावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शीर्षक गीताचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, नागपूर येथील मंत्रिपरिषद सभागृहात पार पडला. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्यभरातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवरील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात मागील काही दिवसांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात अडथळे आले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून अभियानाला नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची स्पष्ट दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश गावांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,गावांचा विकास लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकतो,ग्रामपंचायती डिजिटल,पारदर्शक आणि स्वयंअर्थपूर्ण असाव्यात,गावांचा पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास घडवून आणणे अत्यावश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की, या अभियानासाठी ग्रामसभांमध्ये सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार असून त्यांच्या माध्यमातून अभियानाचा संदेश प्रभावीपणे गावोगावी पोहोचवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये जागरूकता वाढून अभियानाला अधिक लोकसहभाग मिळेल.



