तहानलेल्या जिल्हा परिषदेला दिलासा; उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांच्या आदेशानंतर नवीन वॉटर कुलर व आरओ सुरू
दैनिक प्रबुद्ध राज’च्या बातमीची तात्काळ दखल; ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आता मिळणार थंड व शुद्ध पाणी

तहानलेल्या जिल्हा परिषदेला दिलासा; उपाध्यक्ष इंद्रजीत पवारांच्या आदेशानंतर नवीन वॉटर कुलर व आरओ सुरू
‘दैनिक प्रबुद्ध राज’च्या बातमीची तात्काळ दखल; ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना आता मिळणार थंड व शुद्ध पाणी
सोलापूर :- ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींवर आवाज उठवणाऱ्या दैनिक प्रबुद्ध राजच्या बातमीची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात नवीन वॉटर कुलर व फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यालयात येणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थ, कर्मचारी आणि नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्यालयात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. मुख्यालयातील आरओ यंत्रणा बंद अवस्थेत होती, तर प्रवेशद्वाराजवळील वॉटर कुलरही नादुरुस्त झाले होते. परिणामी ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना खासगी जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा जार संपल्यामुळे नागरिकांना तहान सहन करत प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारीही समोर येत होत्या.

उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी व नागरिकांची होत असलेली गैरसोय दैनिक प्रबुद्ध राजने ठळकपणे समोर आणली होती. या बातमीची दखल घेत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी तत्काळ मुख्यालय शाखेचे शाखा अभियंता चेतन वाघमारे यांना आदेश देत नादुरुस्त सुविधा त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
उपाध्यक्षांच्या आदेशानंतर प्रशासनाने वेगाने हालचाली करत नवीन थंड पाण्याचा वॉटर कुलर बसवला तसेच नवीन आरओ फिल्टर यंत्रणा कार्यान्वित केली. त्यामुळे आता जिल्हा परिषद मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या अनेक नागरिकांनी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या तत्परतेचे कौतुक केले. “बातमी प्रसिद्ध होताच त्वरित निर्णय घेऊन सुविधा उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून चांगली बाब आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालयात वर्षानुवर्षे पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असताना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढाकार घेत तातडीने उपाययोजना केल्यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे “काम करणारा लोकप्रतिनिधी” अशी चर्चा मुख्यालय परिसरात रंगू लागली आहे



