“बोरामणी दर्ग्याजवळ वन विभागाचा बुलडोझर; ३० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त”
“५ जेसीबी, १० टेम्पो, शेकडो कर्मचारी… बोरामणीत दिवसभर रंगली अतिक्रमण हटाव कारवाई”

“बोरामणी दर्ग्याजवळ वन विभागाचा बुलडोझर; ३० हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त”
“५ जेसीबी, १० टेम्पो, शेकडो कर्मचारी… बोरामणीत दिवसभर रंगली अतिक्रमण हटाव कारवाई”
सोलापूर (प्रतिनिधी):- दक्षिण तालुक्यातील बोरामणी परिसरातील दावल मलिक बाबा पीर दर्ग्याजवळ वन विभागाने बुधवारी मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करत परिसरातील अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला. अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याची शेड, टपऱ्या, पाण्याच्या टाक्या आणि पक्की बांधकामे हटवण्यात आली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
वन विभागाने यापूर्वी संबंधितांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, अतिक्रमणे हटवली जात नसल्याने अखेर बुधवारी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत २० ते २५ दुकाने तसेच एकूण ३० ते ४० अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वन विभागाच्या नोंदीनुसार त्या ठिकाणी केवळ मूळ दर्गा, रस्ता आणि पाण्याची विहीर अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित सर्व बांधकामे अनधिकृत असल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली.
बोरामणी परिसरातील वनजमिनीवरील अतिक्रमणांचा मुद्दा राज्याच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. त्यावेळी संबंधितांवर कारवाई करून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वन विभागाने पुन्हा नोटिसा बजावत संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिली होती.
दावल मलिक दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव मन्सावाले आणि सचिव लिजाम मुजावर यांनी २ जानेवारी रोजी सहायक वनसंरक्षक यांच्यासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडली होती. मात्र, आवश्यक आणि ठोस कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

कारवाईदरम्यान तब्बल ५ जेसीबी, १० टेम्पो, ट्रॅक्टर, पोलिस व्हॅन, वन विभागाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास ९०ते १०० अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वनरक्षक गंगाधर कणवस यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ अंतर्गत वन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर वन विभागाने जवळपास १५ जणांना नोटिसा बजावल्या होत्या.

या मोहिमेदरम्यान पुण्याचे वनसंरक्षक अशिष ठाकरे, सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक वनसंरक्षक अजित शिंदे आणि ऐश्वर्या शिंदे, पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, तसेच आर. ए. गांगार्डे, आर. एस. आटोळे, योगेश घोडके, एस. व्ही. मगर, एस. बी. चाटे, ए. एन. करे यांच्यासह वन विभाग आणि पोलिस दलाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*प्रशासनाचा स्पष्ट इशारा*
वनजमिनीवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.



