चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला भव्य प्रारंभ; समता व संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला भव्य प्रारंभ; समता व संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार
महाड :- ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहा’च्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त महाड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.



यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला ‘चवदार तळे’ सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष होता. या लढ्याने समाजात समतेची नवी दिशा दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्या’चा शुभारंभ करण्यात आला. तसेच चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्र व राज्य सरकारमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले तसेच विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा सोहळा केवळ ऐतिहासिक स्मरण नसून, समाजातील विषमता दूर करून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचा नवा संकल्प असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.




