थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; सोलापुरात तलावात उतरून जलसमाधी आंदोलन
"आम्ही भीक मागत नाही, आमचे हक्काचे पैसे मागतोय"; गोकूळ कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; सोलापुरात तलावात उतरून जलसमाधी आंदोलन
“आम्ही भीक मागत नाही, आमचे हक्काचे पैसे मागतोय”; गोकूळ कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
सोलापूर : दहिटणे येथील गोकूळ साखर कारखान्याकडे थकीत असलेले ऊस बिल तातडीने मिळावे या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने बुधवारी उग्र वळण घेतले. संतप्त शेतकऱ्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराज तलावाकडे मोर्चा वळवत जलसमाधी आंदोलन सुरू केले. यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
आंदोलनात सहभागी झालेल्या सोलापूर धाराशिव येथील शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासन आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. “आम्ही भीक मागत नाही, आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे मागत आहोत,” असे म्हणत अनेक शेतकरी तलावात उतरले. काही आंदोलकांनी संतापाच्या भरात तलावात उड्या घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार जमदाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही अधिकारी स्वतः तलावात उतरून आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.
यापूर्वी शेतकरी तलावाकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी पोलिसांचा अडथळा पार करत तलावाकडे धाव घेतली. यावेळी काही काळ पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादीही झाली. वाढत्या तणावामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, थकीत ऊस बिलाचा प्रश्न तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



